डॉ.आनंद यादव यांचं "झोंबी" वाचलं.एक अतिशय अस्वस्थ करणारी सत्यकथा.त्यांचा स्वतःचा लहानपणापासून ते मॅट्रिक होईपर्यंतचा प्रवास यात आहे आणि तो विलक्षण आहे.कागलसारख्या एका सर्वार्थाने मागासलेल्या खेड्यातलं आयुष्य,घरची अत्यंत गरिबी,प्रत्यक्ष वडिलांचा शिक्षणाला कमालीचा विरोध आणि ह्या पार्श्वभूमीवर त्यांची स्वतःची शिकण्याची जबरदस्त इच्छा.माझ्यासारख्या कितीतरी लोकांना मॅट्रिक पर्यंतचंच काय पण उच्च शिक्षण सुद्धा अतिशय सहज गोष्ट असते.पण जिथे जगण्याचीच लढाई लढता लढता आयुष्य संपतं अशा वातावरणात शिकण्याची इच्छा बाळगणं आणि ती तेवढ्याच चिकाटीने पूर्ण करणं ही किती कठीण गोष्ट आहे ते "झोंबी" वाचताना कळतं.प्रसंगी रस्त्यावरच्या कचरापेटीत पडलेल्या केळ्यांच्या साली खाऊन आपली भूक भागवणारा हाच "आन्द्या" सातवीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला येतो,मॅट्रिक तर होतोच पण पुढे जाऊन एम.ए.पर्यंत शिकतो.हे सगळं करताना त्याच्या लहानपणाचा मात्र बळी जातो.ज्या वयात डोक्यावर कोणतंही ओझं नसावं त्या वयात त्याने अक्षरशः ऊर फुटेस्तोवर केलेल्या कष्टांचं वर्णन वाचून सुन्न व्हायला होतं.
माझ्यासारख्यांच्या पांढरपेशा आयुष्याच्या कोष्टकात हे जगणं बसतंच नाही.एक पुस्तक वाचून मला ह्या जगण्याची जी कल्पना आली ती कदाचित फार वरवरचीच असेल.पहिल्यापासून अत्यंत सुखासीन आणि सुरक्षित वातावरणात वाढल्यानंतर मला ह्या जगण्याची खोली कळणं तेवढंच कठीणही आहे.पण आपण जगतो त्या ठराविक वर्तुळाच्या बाहेरही एक जग आहे आणि ते फार वेगळं आहे ही जाणीव मात्र नक्कीच झाली.
Monday, May 29, 2006
Wednesday, May 24, 2006
सुरुवात
खरं तर "दिसामाजी काहीतरी" लिहिलं जाण्याची शक्यता फारच कमी आहे.पण जेव्हा लिहावंस वाटेल तेव्हा लिहिण्याचा विचार मात्र आहे.
Subscribe to:
Posts (Atom)