Wednesday, May 22, 2019

The Handmaid's TaleThe Handmaid's Tale by Margaret Atwood

My rating: 4 of 5 stars


It is a scary book ! In this time and age, we can't imagine women being used merely as birth machines. Being categorized according to their ability to give birth, denying them the right to read, right to earn ..it all sounds like from a bygone era. But twisted ideologies and fanaticism can actually make this happen and it happens under the pretext of protecting women and for the "greater good". The sad part is men too become victims of this system.

Margaret Atwood wrote this in 1985 and it couldn't be more relevant. Today I can't help but remember this tale when a girl has to take the blame for getting molested, when a male driver can't stand a woman overtaking him perfectly, when a women is considered worthless if she doesn't choose to give birth.



View all my reviews

Thursday, May 24, 2018

Danshkaal (दंशकाल)Danshkaal by Rushikesh Gupte
My rating: 5 of 5 stars

दंशकाल वाचून दोन दिवस झाले. अजूनही त्यातली माणसं डोक्यातून गेलेली नाहीत. फार दिवसांनी मानसिकदृष्ट्या इतकी थकवणारी कादंबरी वाचली. माणसाच्या मनाची गुंतागुंत, लालसा, वासना, घराण्याचे पोकळ डोलारे, कोकणाची गूढ पार्श्वभूमी हे सगळं झपाटून टाकणारं आहे. भय आणि मैथुन ह्या आदिम प्रेरणांचा लेखकानं फार उत्तम पद्धतीनं मागोवा घेतला आहे असं वाटलं.

प्रश्न पाडूनच न घेणारा किंवा पडलेल्या प्रश्नांची सोपी उत्तरं शोधणारा, सतत भित्रेपणाची कवचकुंडलं बाळगणारा नानू ओळखीचा वाटत राहतो. नंदाकाकासारख्या रासवट माणसाला, आजीसारख्या राजकारणी बाईला, काकूसारख्या मिटून गेलेल्या बाईला जसा घराण्याचा अभिमान आहे तसा तो भित्र्या नानूलाही आहेच. त्यानं कितीही नाकारला तरी. तो किती पोकळ आहे हे सतत जाणवत राहतं. माझ्यासारख्या तद्दन शहरी बाईला तर असा अभिमान म्हणजे एक कोडंच वाटतं. पण इथल्या सगळ्या पात्रांच्या वागण्यामागे त्या अभिमानाची प्रेरणा दिसून येते आणि ती जराही खोटी वाटत नाही.

आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कथेतल्या स्त्री व्यक्तिरेखा. आजी, काकू, बाई, अनू या सगळ्याच व्यक्तिरेखा खूप सशक्त आणि ताकदीच्या झाल्या आहेत. घरातलं जेन्डर पॉलिटीक्स उलगडवून दाखवत या चौघीजणी भुरळ पडतात.
लेखकाला पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा ! आम्हाला आणखी असंच ताकदीचं आणि सकस लिखाण वाचायला मिळो.


View all my reviews

Monday, January 16, 2017

काही ओळी

१. निळंशार संथ पाणी
सारं काही सामावून घेणारं ...
त्यात सचैल न्हाऊन आता युगं लोटली आहेत

मी पुन्हा एकदा कोरडीच 
नवीन मन्वंतराची वाट पाहत !

२. भवताली जितकी माणसं तितके त्यांचे शब्द
तितकाच  गडद होत जाणारा कल्लोळही ....
कंठाशी येत असणारं काही नकळत दडपू पाहणारा 

त्यातून वाट काढत तळातून शब्द बाहेर येतात
तेव्हाच झालेलं असतं  खरं शांतवन !

Thursday, June 18, 2015

गमावलेल्या संधीची किंमत

मागच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे तक्षशीलाच्या ब्लॉगवरील आणखी एका लेखाचा मराठी अनुवाद केला आहे. जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.

मूळ लेख - कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है 

अनुवाद - गमावलेल्या संधीची किंमत

व्यवहाराची किंमत

मागच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे तक्षशीलाच्या ब्लॉगवरील आणखी एका लेखाचा मराठी अनुवाद केला आहे. जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.

मूळ लेख - फायदा अठन्नी का और खर्चा एक रुपये का

अनुवाद - व्यवहाराची किंमत

Monday, April 06, 2015

वादे वादे जायते तत्त्वबोध:


सरकारच्या कामकाजावर आणि धोरणांवर टीका करणे किंवा आपल्या आवडीचे सरकार आहे म्हणून त्याच्या सर्व निर्णयांचे सरसकट कौतुक करत सुटणे फारच सोपे आहे. पण खरोखरच ही धोरणे काय आहेत? त्याची कारणे काय? परिणाम कोणते? अमुक एका धोरणातून देशाचा विकास साधला जाईल का? असा अभ्यास करून कोणताही निर्णय आणि चर्चा समजून घेणे हे जबाबदार नागरिकाचे लक्षण आहे.

देशातील विविध प्रांतातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एकत्र आणून अशाप्रकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील धोरणांचा अभ्यास करावा यासाठी चेन्नई आणि बंगलोर येथील काही जणांनी मिळून तक्षशीला ही  कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसलेली , non -profit आणि स्वायत्त अशी संस्था सुरू केली. अर्थशास्त्र, शिक्षण, परराष्ट्र धोरण इत्यादी विषयातील मूलभूत मुद्द्यांवर चर्चा करणे, लेख लिहिणे, ते लेख जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचावेत यासाठी प्रयत्न करणे, एकूणच समाजात वैचारिक सहिष्णुता रुजावी यासाठी प्रयत्न करणे हे ह्या संस्थेचे उद्देश. तसेच सरकारी संस्था आणि एनजीओ यांना धोरणे ठरविण्यासाठी सल्लागार म्हणून देखील तक्षशीला काम करते.

विविध विषयांवरील लेख त्यांच्या ब्लॉगवर नियमित प्रकाशित होत असतात. त्यातील प्रणय कोटस्थाने यांनी लिहिलेल्या चाहतें बेशुमार, संसाधनों का तंग हाल ह्या लेखाचा मराठीत अनुवाद करायची संधी मला मिळाली. कोणत्याही वस्तूची किंमत कशी ठरते ? ह्या अत्यंत मूळ प्रश्नावर यात टिप्पणी आहे. जास्तीत जास्त प्रादेशिक भाषांमध्ये अशा मूलभूत विषयांवरील माहिती लिहिली जाऊन ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी यासाठी ह्या ब्लॉगवर इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, कन्नड , मराठी अशा भाषांमध्येही लेख प्रकाशित केले जातात. मराठीत भाषांतर करताना मजा तर आलीच शिवाय अर्थशास्त्राची काहीही पार्श्वभूमी नसलेल्या मला एक महत्त्वाची संकल्पना समजली. मराठीतील अनुवाद - वाढता हव्यास आणि संसाधनांचा तुटवडा


Tuesday, February 18, 2014

पांथस्थ

कोणत्याशा एका काळात कुठल्याश्या एका दिवशी त्या ओसाड माळरानावर एका माणसाची आकृती येताना दिसू लागली. आता ही घटना नवलाची असूही शकेल पण नवल करायला लांब लांबपर्यंत तिथे होतंच कोण? त्याच्या आधी इथे कोणी आलं होतं का, आलं असेल तर कशासाठी आणि इथून पुढे कोणत्या रस्त्याने गेलं ह्याची मोजदाद वरचं निळंभोर आकाश नाहीतर खाली पसरलेली वैराण जमीन ह्यांनी केली असेल तरच ! नाही म्हणायला त्या सगळ्या रखरखाटात कसं कोण जाणे पण एक बारीकसं झाड मात्र तग धरून होतं. त्या झाडाला लागूनच एक अगदी लहानशी देऊळवजा झोपडीदेखील होती. त्याच्या आत कधी कोणी डोकावलं होतं का आणि असेल तर त्याचं पुढे काय झालं हे कळायला मात्र काही मार्ग नाही.


हा येणारा माणूस मात्र काही विशिष्ट उद्देशाने तिथे आला असावा. अनेक दिवसांचा प्रवास केल्यानंतर आलेला थकवा त्याच्या चेहेऱ्यावर दिसत होता. पण ते एकुलतं झाड दृष्टीपथात आलं तसा त्याचा चालण्याचा वेग आपसूकच वाढला. त्या झोपडीपर्यंतचं शेवटचं अंतर तर त्याने जवळ जवळ पळतच पूर्ण केलं. काही शोधत असल्यासारखा त्याने त्या झाडाभोवती आणि झोपडीच्या आसपास तीन चार प्रदक्षिणा घातल्या. शेवटी काहीसा निराश होऊनच तो आत शिरला. बरोबर मध्यभागी असलेला एक दगडी चौथरा, त्याच्यावर एक देवाची मूर्ती आणि कमालीची स्वच्छता वगळता झोपडीत काहीही नव्हतं. तहानलेला, भुकेजलेला आणि दमलेला असा तो तिथेच एका भिंतीला टेकून बसला. बाहेरून क्वचित येणारी हलकी झुळूक आणि नीरव शांतता यामुळे लवकरच त्याला झोप लागली.


बहुधा बराच वेळ गेला. निदान जाग येताना तरी त्याला तसंच वाटलं. दूरवरून येतो आहेसा वाटणारा ततकार जसं आजूबाजूचं भान आलं तसा अगदी जवळच आणि स्पष्ट ऐकू येऊ लागला. उठून बसत डोळे नीट उघडून बघितलं तर त्याला एक वेगळंच दृश्य दिसलं. देवाच्या मूर्तीसमोर एक स्त्री नृत्य करण्यात मग्न होती. अत्यंत साधा वेष आणि समाधानी चेहेरा. ही कोण आणि इथे का आली आहे असे प्रश्न खरंतर त्याला पडलेच होते. पण तिचं त्याच्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं. ती आपल्याच नादात होती . ती समाधी त्याच्याने मोडवेना आणि तिथून नजरही हटेना. काहीतरी मंत्रमुग्ध करणारं त्या नृत्यात होतं खास ! तालात पडणारी पावलं आणि एका लयीत हलणारं शरीर …मनातली भक्ती चेहेऱ्यावर उमटत होती आणि देहातून पाझरत होती. जणू ती तिच्या नृत्यातून एकाग्रपणे देवाची पूजा करीत होती.


बघता बघता अचानक त्याचा चेहेरा उजळला. कितीक दिवस जे शोधत वणवण फिरत होता ते एकदम गवसल्यासारखं झालं. तुकड्या-तुकड्यांनी जगायचा कंटाळा आला म्हणून आपण बाहेर पडलो. हे असंच एकसंध काहीतरी हवंय आपल्याला. हिच्याकडेच तो मार्ग मिळेल. खात्रीच पटली त्याची. हरप्रकारे तिचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न त्याने सुरू केला. पण ती जशी काही नव्हतीच या जगात. त्याची सगळी शक्ती तिच्याशी बोलून उत्तर मिळवण्यासाठी एकवटली. पण तिची एक नजरही त्याच्याकडे गेली नाही. शेवटी थकून आपले हातवारे थांबवत असतानाच काही एक उमगत गेलं मग त्याला. दमून तो झोपडीबाहेर आला तेव्हा त्याचा निश्चय झाला होता.


पुढे… पुढे काय ? पुढे तो आपल्या वाटेने निघून गेला. ते ओसाड माळरान अजून तसंच आहे. अशाच एखाद्या चुकल्या पांथस्थाची वाट बघत !

Saturday, May 04, 2013

कैवल्याच्या चांदण्याला..

आज, उद्या, परवा, महिने, वर्षं अशीच निघून जातात. आपल्याच इच्छा, स्वप्नं, अपेक्षा, आपली असलेली आणि नसलेली माणसं सगळ्यांनी भोवती फेर धरलेला असतो. आपणही त्यांच्या तालात ताल मिळवू बघतो. कधी हे स्वप्न पकड, कधी त्या इच्छेकडे धाव घे, कधी कोणाला चुचकारून बघ. फिरता फिरता लक्षात येतं, जमीन तर कधीच सुटली. आता पाय ठेवायला इथे कुठेच काही नाही.जीव कासावीस होतो. कशाचा आधार शोधायचा तेच कळेनासं होतं. सगळा निरर्थकाचा भोवरा. खोल खोल जावं तसं अजून अजून रिकामी होत जाणारी ओंजळ . का, कशासाठी, कोणासाठी, कुठवर हे कधीच न सुटलेले प्रश्न.


क्वचित कधी पाय जमिनीवर टेकतात.स्वतःचीच पाळंमुळं तपासून बघू लागतात. मातीत हात घालून तण काढताना, अप्रतिम मराठीतली एखादी जबरदस्त कविता ऐकताना, मन लावून नाटक करताना, स्वतःला वाटतं ते हे असं तोडक्या मोडक्या, तुटपुंज्या शब्दात बसविताना, आपल्या असण्याचाच भाग असलेलं काहीतरी अनुभवताना. मुळाशी पोचल्याचा, आपल्याच गाभ्याला स्पर्श करून येण्याचा तेवढा क्षण काय तो खरा. तो क्षण संपल्यावर येणारा रितेपणाही खरा. बाकी सगळा नुसताच गलबला.