Friday, July 03, 2009

पाऊस आणि उगाच काहीतरी

सकाळपासून पाऊस लागलाय. काम करताना राहून राहून खिडकीबाहेर लक्ष जातंय. नजर हटत नाही इतका सुंदर पाऊस. घरी आल्यावर तर खिडकीशीच चिकटून बसलेय.भारतातला पाऊस छान असतो पण इथला पाऊस काही वेगळाच आहे. भारतातला पाऊस एकटा येत नाही. तो बरोबर चिखल, राडा, डबकी,वेगवेगळे वास,ट्रॅफिक जॅम ,खूप सारे हॉर्नचे आवाज अणि पावसाळी सहली घेऊन येतो. इथला पाऊस एकटाच येतो. लांबचलांब रिकामा रस्ता अणि त्यावर सावकाश पडणारा पाऊस पाहिलाय कधी? भारतातला पाऊस तुमच्या खोड्या काढतोय असं वाटतं. इथला पाऊस शांतपणे सोबत करतो. एखादा दिवस office ला जायला म्हणून निघावं आणि अशी मस्त हवा बघून मधेच उतरून इथल्या अप्रतिम नागमोडी रस्त्यांवरून ह्या पावसाबरोबर निरुद्देश भटकत रहावं.


खिडकीतून बाहेर बघताना एकदम हलकं हलकं वाटतंय. आत्ता इथे फक्त मी आणि सोबतीला पाऊस , बाकी सगळी व्यवधानं , सगळी नाती, त्यातल्या आशा, अपेक्षा ,चिंता,त्यातले गुंते काहीही माझ्यापर्यंत पोचतंच नाहीये. हा या पावसाच्या सोबतीचा परिणाम का एकटेपणाचा ? दृष्टिआड सृष्टी असली की मन किती विनापाश होऊ शकतं. हजारो मैल दूर असलेल्या जवळच्या माणसानी आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर सोडून देणं जमतंय की आपल्याला. मग एरवी नात्यातल्या अपेक्षा , इच्छा , अपेक्षाभंग असल्या खो-खो मधे का रमतो आपण?

नाती इथल्या पावसासारखी का नसतात?

Friday, April 18, 2008

जाणीव

रात्रीचे किती वाजले होते काय माहीत,अचानक कसल्यातरी धसक्याने मी जागी झाले.जाग येतायेताच मुळी जबरदस्त भीती वाटली.आपण बेंगलोर सारख्या सर्वस्वी अनोळखी शहरात एका मोठ्या फ़्लॅट मधे एका खोलीत एकट्याच आहोत,कशावरुन ही जागा सुरक्षित आहे,खोलीला लागूनच असलेल्या बाल्कनीमधून कोणी एकदम आत घुसलं तर,असे विचार मनात येउन वाटलेली ती भीती होती.

मग हळूहळू एकेक गोष्ट लक्षात यायला लागली.बाल्कनी जाळी लावून बंद केली आहे,ती तोडून आत घुसणं बरंच अवघड आहे.शिवाय बाल्कनीच्या दाराला आपणच आतून कडी लावली आहे.खोलीच्या दाराला latch लावलेलं आहे.आणि आत घुसणं इतकं सहज शक्य नाहीये असं सगळं लक्षात आल्यावर माझं डोकं ताळ्यावर आलं आणि लगेचच मी निर्धास्तपणे झोपूनही गेले.मगाशी वाटलेल्या भीतीचा मागमूसही उरला नाही. या सगळ्या प्रकारात फार तर दोन-चार मिनिटं गेली असतील.पण मला आजही तेव्हा झालेली माझी घालमेल अगदी लख्ख आठवते.

खरंतर विशेष कधी घरापासून लांब न राहिलेली मी, महिनाभर बेंगलोरला एकटीलाच रहायला मिळणार म्हणून खूप excite झाले होते आणि असं स्वतंत्र रहाण्याचा मनापासून आनंदही घेत होते.इतक्या दिवसात कधीही मला कणभरही भीती वाटली नव्हती.या वेळी मात्र मनात कुठेतरी खोल रुतून बसलेली गोष्ट भसकन समोर यावी तसं झालं. तेव्हा कळलं नाही पण आता लक्षात येतंय, एकटं रहाणं तेव्हा खऱ्या अर्थाने समोर आलं. इथे रहाताना माझ्याबाबतीत जे काय घडेल ते फक्त माझ्यामुळेच असेल हे तेव्हा उमजलं.

Saturday, March 15, 2008

भैरवी

तीन वर्ष एका कंपनी मधे काम करून, केलेल्या आणि न केलेल्या कामाबद्दल जरूरीपेक्षा जरा जास्तच कौतुक गाठीशी बांधून मी बाहेर पडते. नवीन ठिकाणी, इथे आपल्याबद्दल कोणतेच चांगले-वाईट पूर्वग्रह नसतील त्यामुळे आपण खरंच किती पाण्यात आहोत ते आपलं आपल्यालाच कळून येईल असं म्हणत join होते.लोकांच्या ओळखी करुन घेणं, कोणाशी बोलायला बरं वाटतंय ते बघणं,एखाद्याच्या नुकत्याच झालेल्या थोड्याफार ओळखीनी त्याच्या group मधे बसल्यावर आपण गेला अर्धा तास जवळपास काहीही बोललो नाहीये हे लक्षात येऊन ओशाळणं आणि काहीतरी बोलायचा प्रयत्न करणं,मगाशी मॅनेजरशी बोलताना जरा अजून smartly बोलायला हवं होतं का वगैरे विचार करून स्वतःलाच judge करत बसणं, असं सगळं सुरू होतं.

हळूहळू मी नवीन ठिकणी रुळते.कॉफ़ी पीत गच्चीवर एकटंच जाऊन शांत बसायला आवडायला लागतं.जुन्या ऑफ़ीस सारखी आजूबाजूला हिरवीगार झाडं दिसायच्या ऐवजी इथे आटलेली नदी अणि वर घिरट्या घालणारे कावळे दिसणार म्हणून किंचित दुःखी झालेली मी, नदीपलीकडे दिसणारा झाडांचा हिरवागार पट्टा बघून सुखावते.

कधीतरी एक दिवस कळतं की जुन्या ऑफ़िसची ती भाड्याची बिल्डिंग आता मालकाला परत करणार आणि ऑफ़ीस शिफ़्ट होणार.ध्यानीमनी नसताना अचानक माझा गळा दाटून येतो.डोळ्यासमोर त्या ऑफ़ीस मधले लोक, तिथले दिवस या सगळ्यांचा एक कोलाज तयार होतो.काहीतरी संपून गेल्यासारखं वाटत रहातं.मग कळतं की खरंतर ते कधीच संपलं होतं.आता फक्त ते लक्षात येतंय.भर उन्हाळ्यातल्या त्या रखरखीत दुपारची उदासी अजूनच जाणवायला लागते.जागेवर येऊन मी दर पाच मिनिटांनी मेल्स चेक करते पण बहिष्कार टाकल्यासारखी एकही मेल येत नाही.कोणीतरी फोन करेल म्हणून वाट बघत रहाते पण तोही वाजत नाही.दिवसभर खिन्न वाटत रहातं.

ऊन थोडं उतरल्यावर मी गच्चीवर येते.दुपारचा रखरखाट जाऊन आता आलेलं हलकंसं आभाळ आणि लांब कुठेतरी पडलेल्या पावसामुळे येणारा मातीचा मंद वास.ह्या उन्हाळ्याचे तरी किती मूड्स असतात.काहीतरी संपल्याची ती जाणीव आता सुखद होते.एक संपून दुसरं काहीतरी नवीन सुरु होणार असं वाटायला लावणारी....



Monday, May 29, 2006

झोंबी : एक विलक्षण अनुभव

डॉ.आनंद यादव यांचं "झोंबी" वाचलं.एक अतिशय अस्वस्थ करणारी सत्यकथा.त्यांचा स्वतःचा लहानपणापासून ते मॅट्रिक होईपर्यंतचा प्रवास यात आहे आणि तो विलक्षण आहे.कागलसारख्या एका सर्वार्थाने मागासलेल्या खेड्यातलं आयुष्य,घरची अत्यंत गरिबी,प्रत्यक्ष वडिलांचा शिक्षणाला कमालीचा विरोध आणि ह्या पार्श्वभूमीवर त्यांची स्वतःची शिकण्याची जबरदस्त इच्छा.माझ्यासारख्या कितीतरी लोकांना मॅट्रिक पर्यंतचंच काय पण उच्च शिक्षण सुद्धा अतिशय सहज गोष्ट असते.पण जिथे जगण्याचीच लढाई लढता लढता आयुष्य संपतं अशा वातावरणात शिकण्याची इच्छा बाळगणं आणि ती तेवढ्याच चिकाटीने पूर्ण करणं ही किती कठीण गोष्ट आहे ते "झोंबी" वाचताना कळतं.प्रसंगी रस्त्यावरच्या कचरापेटीत पडलेल्या केळ्यांच्या साली खाऊन आपली भूक भागवणारा हाच "आन्द्या" सातवीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला येतो,मॅट्रिक तर होतोच पण पुढे जाऊन ए‍म.ए.पर्यंत शिकतो.हे सगळं करताना त्याच्या लहानपणाचा मात्र बळी जातो.ज्या वयात डोक्यावर कोणतंही ओझं नसावं त्या वयात त्याने अक्षरशः ऊर फुटेस्तोवर केलेल्या कष्टांचं वर्णन वाचून सुन्न व्हायला होतं.

माझ्यासारख्यांच्या पांढरपेशा आयुष्याच्या कोष्टकात हे जगणं बसतंच नाही.एक पुस्तक वाचून मला ह्या जगण्याची जी कल्पना आली ती कदाचित फार वरवरचीच असेल.पहिल्यापासून अत्यंत सुखासीन आणि सुरक्षित वातावरणात वाढल्यानंतर मला ह्या जगण्याची खोली कळणं तेवढंच कठीणही आहे.पण आपण जगतो त्या ठराविक वर्तुळाच्या बाहेरही एक जग आहे आणि ते फार वेगळं आहे ही जाणीव मात्र नक्कीच झाली.

Wednesday, May 24, 2006

सुरुवात

खरं तर "दिसामाजी काहीतरी" लिहिलं जाण्याची शक्यता फारच कमी आहे.पण जेव्हा लिहावंस वाटेल तेव्हा लिहिण्याचा विचार मात्र आहे.