Friday, October 08, 2010

एट, सेव्हन ,सिक्स ,फाईव्ह ...

आधीच ५ मिनिटं उशीर झाला होता.एरोबिक्स हॉल मधे बाहेरूनच डोकावून बघितलं तर बॅच सुरू झाली होती. ("श्या !! नेमका आजच उशीर झाला तर बॅच वेळेवर सुरू झाली.त्यातून ही ताडमाड उंच instructor जराही उशीर खपवून घेत नाही. जावं का बाहेरच्या बाहेर? खाली जाऊन gym करूया आज. नाहीतर जाऊदे , होईल ते होईल .करू एरोबिक्सच !")

"एट, सेव्हन , सिक्स , फाईव्ह ... latecomers please warm yourself up! we are already warmed up!" ("अरे वा !! आज एवढ्यावरच ?एरवी उशीर झाला तर आत घेत नाही")

"अजून वर घे तो पाय.you are only dancing.त्याचा काही उपयोग नाही ...("dancing???? भारी!! :P ")"

"why are you taking a breather between two steps? it looks like an elephant !do it in one go!" ("कसं शक्य आहे? मधे एक tap घेतला नाही तर पडीन मी......पण elephant??? ....ohh not bad !! जमतंय की थोडं थोडं ...")

"आज मी side bending घेणार आहे सगळं.एकेकाचे मस्त tyre आहेत ते जरा कमी करुया."("हिने रोज येऊन एवढं छळलं तर नक्कीच कमी होतील!")

"वाका जरा सगळे अजून.very good. you are doing it well." ("वा!! हिच्याकडून very good वगैरे ..नक्कीच चांगलं जमतंय!")

"एट, सेव्हन ,सिक्स ,फाईव्ह ,फोर, थ्री ,टू,वन ("हुश्श संपलं !!!") and give me one more set एट, सेवन ,..("अरे देवा!! मारणार आहे आज ही! मगाशीच बाहेरच्या बाहेर कटायला हवं होतं का?" )

"very good batch ..आता squats करूयात , मग थोड़े abs आणि stretches" ("finally!! उड्या मारणं संपलं ..abs, stretches आणि squats ठीक आहे. ते जमतं आणि करताना भारी पण वाटतं")

"now relax for a while. put one side of your face on your palms and close your eyes."

मी पालथ्या हातावर डोकं ठेवून शांतपणे डोळे मिटून घेतले. एवढा सगळा दंगा घालून आता पडल्यावर एकदम निवल्यासारखं वाटत होतं. ते निवलेपण हळू हळू संपूर्ण शरीरात झिरपत जाताना जाणवत होतं. जणू काही माझ्या शरीराचा आणि मनाचा एकमेकांशी संवाद चालू होता.state of complete bliss!!!

आणि त्याच state of bliss मधे मला हे लिहावंसं वाटलं ! :-)

Friday, May 14, 2010

पारतंत्र्य

स्थळ:पाणीपुरीची एक टपरी.
एक सुखवस्तू कुटुंब पाणीपुरी खात होतं. आई-बाबा आणि दोन पाच ते दहा वर्षांची मुलं. बाबा त्या पाणीपुरी विकणाऱ्या माणसाला मध्येच म्हणाले "ए ,ह्यात पाणी घाल रे जरा अजून". वाक्य तसं साधंच पण म्हणायची पद्धत किंवा tone साधा नव्हता. त्यात त्या विकणाऱ्याबद्दलची तुच्छता आणि स्वतःबद्दलचा माज ठासून भरलेला होता.

आपण चांगल्या खात्यापित्या घरातले, कुठेतरी white collar नोकरी नाहीतर व्यवसाय करणारे म्हणून हातगाडीवर काहीतरी विकणाऱ्यापेक्षा किंवा हॉटेल मधल्या वेटरपेक्षा वरचढ आहोत आणि त्यांच्याशी कसंही बोलू शकतो,असं का वाटतं ? साधी गोष्ट आहे,ज्याची आपली ओळख नाही अशा माणसाशी बोलताना आपण अहो-जाहो वापरतो किंवा अरे-तुरे केलं तरी त्यात तुच्छता नसते. हे जर एरवी आपण करू शकतो तर वॉचमन ,हातगाडीवाले, वेटर , मोलकरणी यात अपवाद का? मग आपलं काम केल्याबद्दल त्यांना thank you म्हणणं तर सोडाच. एखादा माणूस योग्य मार्गाने कष्ट करून स्वतःचं पोट भरत असेल तर किमान अपेक्षित असणारा आदर देखील त्याला द्यायचा का नाही हे तो white collar काम करतो का blue collar यावर का ठरतं ?

एकूणच आपण भारतीय लोक शारीरीक श्रमांना फारशी किंमत देत नाही यात काही नवीन नाही. the interesting question is "why" are we like this? मुळात शेतीप्रधान देश, सगळ्या प्रकारच्या लोकांना सामावून घेण्याचा इतिहास ,त्याला पूरक अशी प्राचीन समाजव्यवस्था असं सगळं असतानाही ही शारीरीक कष्टांना कमी लेखण्याची वृत्ती आली कोठून? एक शक्यता वाटते...दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केल्यानंतर आणि त्याच्याही आधी वेगवेगळ्या परकीय आक्रमणांचा अनुभव घेतल्यानंतर जो प्रगत तो वरचढ हे तत्त्व आपल्या लक्षात आलंच असणार. त्यांनी जशी आपल्यावर सत्ता गाजवली तशी आपण आपल्याच देशातल्या कमी प्रगत लोकांवर गाजवायची हे इतक्या वर्षांत आलेल्या न्यूनगंडातून रुजलं असावं. मग ज्याच्याकडे जास्त पैसा,शिक्षण,सोयी-सुविधा किंवा हे सगळं आहे तोच प्रगत आणि म्हणून वरचढ. त्यातूनच अशा so called वरचढ लोकांमध्ये आलेली इतरांबद्दलची तुच्छतेची भावना.

एखाद्या राजवटीचे फक्त राजकीयच नव्हे तर समाजाच्या मानसिकतेवर देखील किती खोलवर परिणाम होऊ शकतात.

p.s - discussion with siddhya

Tuesday, April 13, 2010

विहीर

तसं पहायला गेलं तर 'विहीर' या चित्रपटामध्ये नचिकेतचा मृत्यू सोडून रुढार्थाने काहीच घडत नाही.बाकी सगळा चित्रपट नचिकेतचा जवळचा मावसभाऊ समीरवर या मृत्यूचा काय परिणाम होतो याभोवती फिरतो.

नचिकेतच्या अचानक जाण्याने सैरभैर झालेल्या समीरच्या मनात प्रचंड खळबळ माजली आहे.पण त्याच्या आजूबाजूची माणसं, घटना पूर्वीसारख्याच आहेत. बाहेरून तोही शक्य तेवढा भोवतालच्या जगाशी सुसंगत वागायचा प्रयत्न करतोय.पण एकीकडे सतत तो घडलेल्या गोष्टीचा ,नचिकेतच्या आधीच्या बोलण्याचा विचार करतोय, त्याला वेगवेगळे प्रश्न पडतायत.

त्याचं शाळेत जाणं, पोहायला जाणं ,अस्वस्थ होऊन घरातून निघून जाणं... या सगळ्या घटना दाखवताना विविध चौकटींचा,दृश्यांचा वापर होतो.मध्येच एक बाई पाणी भरताना दिसते ,एक माणूस घोड्यावरून जाताना दिसतो , बिल्डिंग मधली भांडणं ... वरवर पहाता या सगळ्या चौकटी किंवा दृश्ये संदर्भहीन आणि एकमेकांशी विसंगत वाटतात. पण त्याचा एकत्रित विचार केला तर सभोवतालच्या routine, एकसुरी वातावरणात राहूनही चाललेली समीरच्या मनातली घालमेल,त्याला बसलेला धक्का या गोष्टी अधोरेखित होतात. त्याची जी आतल्याआत उलथापालथ चालू आहे त्याचं बाहेरच्या कोणालाच काही देणंघेणं नाहीये.त्यांच्या ती लक्षातही येत नाहीये.स्वतः समीर तर या भोवतालच्या जगात असून नसल्यासारखा झालाय.

हे सगळं बघताना बरेच प्रेक्षक कंटाळतात (त्यात मी पण आले).कारण इतका वेळ चित्रपट बघूनही अजून काहीच 'घडत' नाहीये असं वाटतं.पण मुळात पडद्यावर दुसऱ्या कोणाच्यातरी आयुष्यात घडणाऱ्या घटना बघताना त्या केवळ बघूनच समजतात असं नाही तर कधीकधी अनुभवाव्या लागतात. आपल्याला मात्र त्यात काहीतरी निष्कर्ष निघायला हवा असतो.मग तो दिग्दर्शकाने तरी काढून द्यावा किंवा आपल्याला काढायला वाव ठेवावा.विहीर मध्ये नेमकं यातलं काहीच होत नाही.एखादं चित्र असावं तसा हा चित्रपट दिसतो.

कुठल्याही नाटकाच्या ,चित्रपटाच्या किंवा कलाकृतीच्या मागचा अगदी मूळ हेतू हा ती बनवणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचे किंवा भावनांचे सादरीकरण (presentation) अथवा प्रकटीकरण (expression) हा असतो. जेव्हा कलाकृतीमधून एखादा विचार मांडायचा असतो तेव्हा तो समजणं तेवढं कठीण जात नाही.कारण ते समजून घेणं जाणीवेच्या पातळीवर असतं.तुम्ही समोर घडणारी घटना बघता ,त्यावर विचार करता,तो दिग्दर्शकाच्या म्हणण्याशी पडताळून पहाता. पण जेव्हा एखाद्या भावनेचे बारकावे मांडले जातात तेव्हा ही प्रक्रिया ज़रा वेगळी होते. एकदम संवेदनशील कलाकृती बनवताना ती बनवणारा ज्या मनःस्थितीत असतो किंवा ज्या अनुभवातून गेलेला असतो त्याचा अंदाज बघणाऱ्याला येईलच असं नाही. ते समजून घेणं हे बघणाऱ्याच्या मानसिकतेवर, संवेदनशीलतेवर ,त्याने आजवर अनुभवलेल्या गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणूनच अशा कलाकृतीमधून रुढार्थाने काही 'takeaway' नसला तरी ती नेणिवा समृद्ध करणारा एक अनुभव देऊ शकते.

Monday, April 12, 2010

मोहे तोही लागी कैसे छूटे री

The Japanese Wife बघितला आणि एकदम आठवला तो 'बयो' . तेच निरपेक्ष प्रेम, एकमेकांसाठी जगाच्या अंतापर्यंत वाट बघायची तीच ती तगमग, एकाने दुसऱ्याचा घेतलेला अखंड ध्यास आणि दुर्दैवी अखेर.

एकीकडे उधाणलेला समुद्र आणि जीवघेणं सूफी संगीत तर दुसरीकडे पिसाळलेली 'मातली' नदी आणि वेडावाकडा कोसळणारा पाऊस.

लंडनला गेलेल्या विश्वनाथाचं उत्तर आलं नाही तरीही सतत पाच वर्षे चिकाटीने पत्र पाठवत रहाणारी बयो आणि केवळ पत्रांमधून एकमेकांना भेटलेले आणि लग्न करून सतरा वर्षे पत्रांमधूनच सहजीवन अनुभवलेले स्नेहमोय आणि मियागे.

पाच वर्षे विश्वनाथाच्या उत्तराची वाट पाहिल्यानंतर आणि पैसे साठवल्यानंतर थेट लंडनला जायला निघणारी कोकणातली बयो आणि जपानमधल्या मियागेला कॅन्सर झाला म्हणून तिच्या उपचारासाठी कलकत्त्यातल्या डॉक्टर आणि वैद्य लोकांचे उंबरठे झिजवणारा स्नेहमोय..

"तू कोकणातली मुलगी,लंडनला वगैरे जाण्याचं खूळ कशाला घेऊन बसलीयेस?" असं विचारल्यावर बयो "मग,पाच वर्षे झाली, विश्वनाथाचं काही उत्तर नाही,काय झालंय ,काही अड़चण आहे का,जाऊन बघायला नको?" असं अतिशय सहजतेने उत्तर देते.कुठेही विश्वनाथाने आपल्याला सोडलं तर नाही ना अशी शंका नाही, अविश्वास नाही. इतकं शुद्ध प्रेम बघून खरंतर अस्वस्थ व्हायला होतं. कॅन्सरवर जपानमधे भारतापेक्षा जास्त नीट उपचार होऊ शकतील हे माहीत असूनही ,परवडत नसताना कुठल्यातरी वैद्याने दिलेले काढ़े मियागेला पाठवणारया स्नेहमोयची जातकुळी नि:संदेह प्रेमाचीच .

बयो पाहिला तेव्हा प्रचंड आवडला होता.खूप intense सिनेमा आहे .मी परत नाही बघू शकणार.The Japanese Wife तसा विशेष आवडला नाही. पण कोणताही आव न आणता स्वतःच्या प्रेमावर गाढ़ विश्वास ठेवणारे ,मीपण ,पैसा ,प्रतिष्ठा ,कष्ट यांची पर्वा करण्याच्या पलिकडे गेलेले स्नेहमोय,मियागे आणि बयो यांचं कुठेतरी नातं आहे असं वाटत रहातं.

Thursday, February 04, 2010

आस

मनसोक्त निरूद्देश भटकणं अवघड झालंय आजकाल ,
त्याजुन्या गल्लीतले लोक आता अनोळखी नजरेने पहातात

एकट्याने फिरायची तर परवानगीच नाहीये
कधी गेलंच कुठे एकटं ,
तर त्यांची संशयीत नजर तुमच्या बरोबर नसलेल्या दुसऱ्याला शोधत रहाते
तुमच्या येण्याची कारणं मागत रहातात ,नजरेतून ,वागण्यातून
त्यांच्या अपेक्षेत बसणारी उत्तरं माझ्याकडे नसतातच ,
आणि नसतात त्यांना हवे असलेले प्रश्नही

अजून एक वाट बंद झाली असं मनाशीच म्हणत मी हळूच तिथून निघून येते ,
मात्र अजून न भेटलेल्या वाटेची आस खोलवर तशीच असते.