
My rating: 5 of 5 stars
दंशकाल वाचून दोन दिवस झाले. अजूनही त्यातली माणसं डोक्यातून गेलेली नाहीत. फार दिवसांनी मानसिकदृष्ट्या इतकी थकवणारी कादंबरी वाचली. माणसाच्या मनाची गुंतागुंत, लालसा, वासना, घराण्याचे पोकळ डोलारे, कोकणाची गूढ पार्श्वभूमी हे सगळं झपाटून टाकणारं आहे. भय आणि मैथुन ह्या आदिम प्रेरणांचा लेखकानं फार उत्तम पद्धतीनं मागोवा घेतला आहे असं वाटलं.
प्रश्न पाडूनच न घेणारा किंवा पडलेल्या प्रश्नांची सोपी उत्तरं शोधणारा, सतत भित्रेपणाची कवचकुंडलं बाळगणारा नानू ओळखीचा वाटत राहतो. नंदाकाकासारख्या रासवट माणसाला, आजीसारख्या राजकारणी बाईला, काकूसारख्या मिटून गेलेल्या बाईला जसा घराण्याचा अभिमान आहे तसा तो भित्र्या नानूलाही आहेच. त्यानं कितीही नाकारला तरी. तो किती पोकळ आहे हे सतत जाणवत राहतं. माझ्यासारख्या तद्दन शहरी बाईला तर असा अभिमान म्हणजे एक कोडंच वाटतं. पण इथल्या सगळ्या पात्रांच्या वागण्यामागे त्या अभिमानाची प्रेरणा दिसून येते आणि ती जराही खोटी वाटत नाही.
आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कथेतल्या स्त्री व्यक्तिरेखा. आजी, काकू, बाई, अनू या सगळ्याच व्यक्तिरेखा खूप सशक्त आणि ताकदीच्या झाल्या आहेत. घरातलं जेन्डर पॉलिटीक्स उलगडवून दाखवत या चौघीजणी भुरळ पडतात.
लेखकाला पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा ! आम्हाला आणखी असंच ताकदीचं आणि सकस लिखाण वाचायला मिळो.
View all my reviews