हळूहळू मी नवीन ठिकणी रुळते.कॉफ़ी पीत गच्चीवर एकटंच जाऊन शांत बसायला आवडायला लागतं.जुन्या ऑफ़ीस सारखी आजूबाजूला हिरवीगार झाडं दिसायच्या ऐवजी इथे आटलेली नदी अणि वर घिरट्या घालणारे कावळे दिसणार म्हणून किंचित दुःखी झालेली मी, नदीपलीकडे दिसणारा झाडांचा हिरवागार पट्टा बघून सुखावते.
कधीतरी एक दिवस कळतं की जुन्या ऑफ़िसची ती भाड्याची बिल्डिंग आता मालकाला परत करणार आणि ऑफ़ीस शिफ़्ट होणार.ध्यानीमनी नसताना अचानक माझा गळा दाटून येतो.डोळ्यासमोर त्या ऑफ़ीस मधले लोक, तिथले दिवस या सगळ्यांचा एक कोलाज तयार होतो.काहीतरी संपून गेल्यासारखं वाटत रहातं.मग कळतं की खरंतर ते कधीच संपलं होतं.आता फक्त ते लक्षात येतंय.भर उन्हाळ्यातल्या त्या रखरखीत दुपारची उदासी अजूनच जाणवायला लागते.जागेवर येऊन मी दर पाच मिनिटांनी मेल्स चेक करते पण बहिष्कार टाकल्यासारखी एकही मेल येत नाही.कोणीतरी फोन करेल म्हणून वाट बघत रहाते पण तोही वाजत नाही.दिवसभर खिन्न वाटत रहातं.
ऊन थोडं उतरल्यावर मी गच्चीवर येते.दुपारचा रखरखाट जाऊन आता आलेलं हलकंसं आभाळ आणि लांब कुठेतरी पडलेल्या पावसामुळे येणारा मातीचा मंद वास.ह्या उन्हाळ्याचे तरी किती मूड्स असतात.काहीतरी संपल्याची ती जाणीव आता सुखद होते.एक संपून दुसरं काहीतरी नवीन सुरु होणार असं वाटायला लावणारी....
1 comments:
tumachi lihinyachi khup chhan ahe... ! Shubhechha...!
Post a Comment