Saturday, March 15, 2008

भैरवी

तीन वर्ष एका कंपनी मधे काम करून, केलेल्या आणि न केलेल्या कामाबद्दल जरूरीपेक्षा जरा जास्तच कौतुक गाठीशी बांधून मी बाहेर पडते. नवीन ठिकाणी, इथे आपल्याबद्दल कोणतेच चांगले-वाईट पूर्वग्रह नसतील त्यामुळे आपण खरंच किती पाण्यात आहोत ते आपलं आपल्यालाच कळून येईल असं म्हणत join होते.लोकांच्या ओळखी करुन घेणं, कोणाशी बोलायला बरं वाटतंय ते बघणं,एखाद्याच्या नुकत्याच झालेल्या थोड्याफार ओळखीनी त्याच्या group मधे बसल्यावर आपण गेला अर्धा तास जवळपास काहीही बोललो नाहीये हे लक्षात येऊन ओशाळणं आणि काहीतरी बोलायचा प्रयत्न करणं,मगाशी मॅनेजरशी बोलताना जरा अजून smartly बोलायला हवं होतं का वगैरे विचार करून स्वतःलाच judge करत बसणं, असं सगळं सुरू होतं.
हळूहळू मी नवीन ठिकणी रुळते.कॉफ़ी पीत गच्चीवर एकटंच जाऊन शांत बसायला आवडायला लागतं.जुन्या ऑफ़ीस सारखी आजूबाजूला हिरवीगार झाडं दिसायच्या ऐवजी इथे आटलेली नदी अणि वर घिरट्या घालणारे कावळे दिसणार म्हणून किंचित दुःखी झालेली मी, नदीपलीकडे दिसणारा झाडांचा हिरवागार पट्टा बघून सुखावते.कधीतरी एक दिवस कळतं की जुन्या ऑफ़िसची ती भाड्याची बिल्डिंग आता मालकाला परत करणार आणि ऑफ़ीस शिफ़्ट होणार.ध्यानीमनी नसताना अचानक माझा गळा दाटून येतो.डोळ्यासमोर त्या ऑफ़ीस मधले लोक, तिथले दिवस या सगळ्यांचा एक कोलाज तयार होतो.काहीतरी संपून गेल्यासारखं वाटत रहातं.मग कळतं की खरंतर ते कधीच संपलं होतं.आता फक्त ते लक्षात येतंय.भर उन्हाळ्यातल्या त्या रखरखीत दुपारची उदासी अजूनच जाणवायला लागते.जागेवर येऊन मी दर पाच मिनिटांनी मेल्स चेक करते पण बहिष्कार टाकल्यासारखी एकही मेल येत नाही.कोणीतरी फोन करेल म्हणून वाट बघत रहाते पण तोही वाजत नाही.दिवसभर खिन्न वाटत रहातं.
ऊन थोडं उतरल्यावर मी गच्चीवर येते.दुपारचा रखरखाट जाऊन आता आलेलं हलकंसं आभाळ आणि लांब कुठेतरी पडलेल्या पावसामुळे येणारा मातीचा मंद वास.ह्या उन्हाळ्याचे तरी किती मूड्स असतात.काहीतरी संपल्याची ती जाणीव आता सुखद होते.एक संपून दुसरं काहीतरी नवीन सुरु होणार असं वाटायला लावणारी....

1 comment:

Amar said...

बहिष्कार टाकल्यासारखी एकही मेल येत नाही +१